शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

ये रे घना.

    ये रे घना.



काहीश्या उशिराने का होईना; पण तो आला आणि सगळ्यांना सुखावून गेला.

शाळा संपली आणि नवीन नवीन कॉलेज सुरु झालं. आपलं देखील एखाद्या हिंदी चित्रपटासारखं एकदम फिम्ली कॉलेज असावं असे मला वाटू लागले. माझा स्वभाव थोडा शांतच, म्हणून नव-नवीन मित्रमैत्रिणी बनवायला मला थोडं जड जात होतं; पण माझे क्लासमेट्स खूप मस्त होते. लवकरच आमचा ग्रुप तयार झाला.

माझ्या शांत स्वभावामुळे लेक्चर बुडवून कॅन्टीनमध्ये मज्जा- मस्करी करत असताना मोस्टली मीच त्यांची टार्गेट असायचे. त्यावेळी थोडसं ऑड वाटायचं.... बट ये तो मस्तीकी पाठशाला है ना. इतना एन्जॉयमेंट तो चालता ही है.. असा विचार करून मीही त्यांच्यात हळूहळू सामील व्हायला लागले.

जून-जुलै महिना आला. पावसाचे दिवस सुरु झाले. तशी या पावसाला  खूप टोपण नावं आहेत. काहींसाठी तो वैतागवाणा, चिखल करणारा, सगळीकडे रोगराई पसरवणारा, घाण करणारा पाऊस असतो.

पण पाऊसवेडी मी, माझ्या दृष्टीकोनातून तो चिंब भिजवणारा सुखद ओला स्पर्श आहे. 

म्हणजे त्याच्या नुसतं बरसण्यानेही माझं मन सुखावलं जातं . पावसाच्या गारव्यात मस्तपैकी हिरवळ बघत बाहेर फिरायला जाणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. मला कधीच तो त्रासदायक, घाणेरडा वाटलाच नाही. पाऊस  ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आत स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणामध्ये आहे? ही किमया फक्त पाऊसच करू शकतो.  

असचं एके दिवशी लेक्चर संपवून आम्ही सगळे कॉलेजमागच्या टेकडीवर फिरायला गेलो. अर्ध्या वाटेतच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरु झाला. बघता बघता त्याच्या जलधारा वाढू लागल्या. काहींकडे छत्री, रेनकोट, विंडचीटर असून सुद्धा कोणीच ते सॅक मधून बाहेर काढले नाही. सगळ्यांनाच तो हवाहवासा वाटत होता. एरवी असा पाऊस आला की जो तो घरात घुसतो, दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो. आज मात्र सगळेच बेभान होऊन भिजू लागले. भोवताल पाऊसमय झाला होता. मी मित्रमंडळींकडे पहिले आम्ही सगळेच पावसात चिंब भिजलो होतो.  म्हणजे अगदी नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर अंगावरून खाली उतरत होते. ते दृश्य  मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता. 

एरवी ओसाड दिसणारी ही टेकडी जिच्या उंच टोकावर गणपतीचं मंदिर आहे. जे कॉलेजमधूनसुद्धा सहज दिसायचे तेच मंदिर आता हिरव्यागार घट्ट झाडांमध्ये लपून गेले होते. तिथवर जाणारा रस्तादेखील आता कठीण आणि घसरट झाला होता. तरीही आम्ही सगळे त्या मंदिरात गेलो. 

मंदिरच्या आवारात पालापाचोळा विखुरला होता. म्हणून आम्ही सगळेजण  मिळून तो साफ करू लागलो. सगळा कचरा एकत्र एका जागी जमा करून ठेवला आणि पुन्हा सगळ्यांची दंगा मस्ती सुरु झाली.
एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे पाऊस इकडेतिकडे वाऱ्यासोबत हुंदडत होता. आम्ही सगळेदेखील अगदी लहान मुलांसारखे त्याच्या अवखळपणात सामील होऊन पावसात खेळू लागलो. 

आमचा आवाज ऐकून मंदिरातले पुजारी आजोबा  बाहेर आले आणि काहीश्या ओरडण्याच्या स्वरातच ते आम्हाला म्हणाले, ‘काय रे पोरांनो किती तो तुमचा कल्ला?, आज इकडे कशी वाट चुकली म्हणायची तुमची?, आज कॉलेजला दांडी मारली वाटतं?’
असे सगळे प्रश्न विचारताना त्यांची नजर आजूबाजूला मंदिराच्या परिसरावर पडली आणि ते म्हणाले,’पोरांनो तुम्ही तर आवार पूर्ण स्वच्छ केलात. या आता आत. पुरे झालं तुमचं भिजणं.’ 

आम्ही सगळे मंदिराच्या ओटीवर जाऊन विसावलो. पुजारी आजोबा गाभाऱ्यातून प्रसाद आणत म्हणाले, ‘ अरे मुलांनो आज तुम्ही माझं बरचसं काम हलकं केलत. नाहीतर या वाऱ्या आणि पावसामुळे रोज प्रचंड कचरा आवारात जमा होतो आणि तो केर कचरा साफ करताना माझी पूर्ण दमछाक होते.

मंदिराच्या ओटीवर  बसलेले असताना सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. कोण दंतकथा सांगत होता. कोण त्यांनी अनुभवलेले निरनिराळे अनुभव संगत होते तर काहीजण उगाचच टिंगलटवाळ्या करत होते. 

माझे अर्धे लक्ष मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाकडे होते. त्या उंच कोरड्या टेकडीवर हिरवी शाल पांघरावी तश्याच हिरव्या झाडांनी, रोपट्यांनी, वेलींनी आपले जाळे पसरवले होते. सगळी झाडे शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. दूरवर पसरलेल्या धुक्यामुळे सगळं अस्पष्ट दिसत होतं. आभाळभर पाऊस पाऊस होता. पूर्ण टेकडीवर जणू ढगच खाली उतरलेत की काय असे भासत होते. नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे बऱ्याचश्या झाडांना नवीन पालवी फुटली होती. निसर्गाचा हा अविष्कार पाहून खरच आवाक व्हायला होतं.

हे सगळं पहाण्यात मी एवढी मग्न झाले होते की वेळेचं आणि भुकेचं भानच राहिलं नाही. खरं तर तिकडे पोहचेपर्यंत सगळ्यांनाच भूक लागली होती. तरी पुजारी आजोबांनी दिलेल्या प्रसादामुळे पोटाला थोडा आधार तर मिळाला होता; पण आता मात्र सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडू लागले होते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, ‘ चला भूक लागली आहे. आता खाली उतरून पहिले पेटपूजा करायला हावी. म्हणूनच जास्त वेळ न दवडता आम्ही सगळे परतीला निघालो.

त्यानंतर आम्ही सगळे पावसात चिंब भिजून, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आलो. बाहेर मस्त पाऊस पडत होता. कॅन्टीनमधल्या हरी काकांनी बनवलेल्या गरमा गरम आल्याच्या चहाचा सुगंध सगळीकडे पसरला होता. म्हणूनच सगळ्यांना चहा आणि काहीतरी गरम गरम खायची इच्छा झाली. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं,  'अरे, बाहर इतनी अच्छी बारीश और इस बारीशमे पकोडे नाही खाये तो क्या खाक मजा आयेगा'. अश्याप्रकारे चहा आणि कांदा भजी मागवून त्यावर सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला.

(ते दिवस आठवून खरचं खूप भारी वाटतं. बाहेर पाऊस सोबतीला गरमा गरम चहा, कांदाभजी आणि मित्र मैत्रिणींसोबत दिखुलास गप्पा.... आऽऽ हाऽऽऽ... माहोल..)

संध्याकाळ झाली होती. कॅन्टीन मध्ये टिंगलटवाळ्या करून झाल्यानंतर आम्ही सगळे आपापल्या घरी जायला निघालो. सगळ्यांना सी यु टुमारो म्हणून निरोप घेतला आणि मी घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आता मी एकटी होते आणि जोडीला होता माझा रिमझिम बरसणारा पाऊस.

थोडं अंतर कापल्यावर, थोडा शांत आणि कमी रहदारीच रस्ता सुरु झाला. आजूबाजूला हिरव्यागार शेतात शेतकरी पिकांची लावणी करत होते. वाऱ्यावर डोलणारी पिकं जणू त्याच्या इशाऱ्यावरच नाचत आहेत की काय असे भासत होते. लांब गेलेले पक्षी आपआपल्या घरट्याकडे परतले. थंडीने कुडकुडणाऱ्या आपल्या पिल्लांना पावसात भिजलेले पंख झटकून कुशीत घेतले. त्यांच्या चोचीत प्रेमाने घास भरवला.

नेहमी संध्याकाळ झाली की आकाशात सारे ढग रंगपंचमी खेळत आहेत की काय असे भासायचे पण आज मात्र असे काहीच नव्हते. साऱ्या रंगांची जागा आज काळसर रंगाने घेतली घेतली होती आणि अश्या ढगाळ वातावरणामुळे रात्रीआधीच अंधार दाटू लागला होता.

गेले दहा मिनिटे मी हे सारं शांत एकाबाजूला उभी राहून पाहत होते.

वाऱ्यासोबत पावसाच्या त्या रिमझिम जलधारांचा अंगाला स्पर्श होताच; मन अगदीच शहारून उठलं. परमेश्वराने बनवलेल्या निसर्गाच्या अभूतपूर्व अश्या या पाऊसरुपी कारंज्याची कल्पनाच किती भन्नाट आहे याचा अनुभव घेत घेत मी पुढे पुढे घराच्या दिशेने चालू लागले.

नेहमी घरापासून माझं कॉलेज एवढ्या लांब का आहे?.. अशी चीड चीड करणारी मी, आज तोच रस्ता मला संपूच नये असे वाटत होते.

इतर वेळी स्वच्छता आणि टापटीपपणाचा कळस करणारी मी.. चक्क पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात उडी मारून चहु बाजूला पसरणाऱ्या पाण्यातसुद्धा माझा आनंद मिळवत होते. बघता बघता घर जवळ आलं. तेवढ्यात एका मैत्रिणीचा फोन आला. तिने सांगितलं की सगळ्यांनी मिळून पुन्हा  पावसात लांब कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं आहे आणि तुला हि आमच्यासोबत यायचं आहे. मी क्षणाचाही विलंब करता होकार दिला आणि अश्याप्रकारे पुन्हा एकदा आमचं रेनी पिकनिक अरेंज करायचं ठरलं होतं.

आणि नेहमीप्रमाणेच खट्याळ पावसाची नेमकी ऐनवेळेला हुलाहूल सुरु झाली. पुढचे काही दिवस पावसाचे असेच चालू होते. आकाशात काळे ढग जमा झाले की आशा वाटायची की  आता पाऊस पडेल, ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा कमी होऊन आता त्याच्या थंडगार सरी बरसावून तो सगळ्यांना सुखावेल; पण तेवढ्यातच कडकडीत उन पडायचं आणि पण पल्लवित झालेल्या अशा मावळून जायच्या.

गेल्या काही दिवसांपासून जमा होणाऱ्या ढगांनी हुलकावणी दिल्याने अजूनही आम्ही सगळे पावसाची प्रतीक्षा करत होतो; पण पाऊस मात्र काही केल्या पडत नव्हता. जणू पावसाने कुठेतरी दडी मारली आणि आमच्या सगळ्यांचाच हिरमोड झाला. त्यादिवसापासून आजपर्यंत सगळेच पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.

त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करण्याचे प्लान्स सुरु असतानाच न जाणो का; तो अचानक हिरमुसला आणि ढगांच्या आड जाऊन लपून बसला. त्यादिवसापासून त्याला प्रत्येक जण साद घालतोय.

पावसाच्या रुसण्यामुळे आमची रेनी पिकनिक लांबली याच दुःख नाही पण; त्याच्या अश्या अचानक जाण्यामुळे शेतकरी राजाचं झालेलं नुकसान याचं दुःख जास्त आहे.सुरवातीच्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांनी  वेग घेतला होता. बळीराजाच्या हाकेला प्रतिसाद देऊन तो येतो खरा; पण अगदी चटकन येतो आणि आल्या पावली पटकन निघूनही जातो.
अरे पावसा, या पृथ्वीवर जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरता शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर रुसू नकोस. त्याचे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून, त्याचे सर्वस्व आहे. एखाद्या मुलाचे पालनपोषण करतात, त्याच पद्धतीने तो जमिनीची मशागत करून तिला सुपीक बनवतो. त्याचे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे. तो तुझ्यावर अवलंबून आहे रे पावसा. तो तुझ्या वाटेकडे टक लावून पाहतो आहे.

अरे पावसा, तू रिमझिम बरसून दिलेल्या या सुखद आनंदासाठी मी तुझी आभारी आहे.

वीज, पाणी, अन्न अश्या अनेक गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत रे..शेतकरी आणि पाण्यातील जलजीवनासाठी तर तू वरदान आहेस. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे ती धो धो कोसळणाऱ्या पावसाची. पावसाचे आगमन पृथ्वीवरील सर्व जीवांच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे.

का रागावलाय तो? कधी येणार? उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच थंडगार वातावरणाची ओढ लागली आहे. सर्वांचेच डोळे आता त्याच्या वाटेकडे लागलेत.
तर मग प्लीज, रुसवा सोड आणि ये रे ये रे पावसा!

आणि नुसता येऊ नकोस तर, "पाऊस आला मोठा, नाही सुखसमृद्धीला तोटा" याची प्रचीती देऊन जा रे बाबा!







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

त्याचा अपूर्ण संवाद.

आज प्रिया ऑफिसमधून घरी आल्यावर, आवरून तिने फोन हातात घेतला. तिच्या ऑनलाईन अकाऊंटवर एक अनोळखी मेसेज होता. म्हणून आगोदर तिने एवढ लक्ष दिलं नाह...