सोमवार, १४ जून, २०२१

'ती'च्या आठवणीत


समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा सुटला होता. तनय आणि त्याचे सगळे मित्र मैत्रिणी सीफेस वर फिरायला आले होते. ढग दाटून आले होते. पावसाने काळोख केला होता.

पाऊस सुरु झाला की सीफेसवर मित्रांसोबत कल्ला करण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही असे तनयला वाटे. पण एकटं निवांत किनाऱ्यावर बसण्यात जो आनंद आहे तोही काही कमी नाहीये. त्यातपण जर ती सोबत असेल तर बातच और.

असा सगळा विचार करत तनय एक टक क्षितिजाकडे पाहत मनोमन तिला आठवत होता. वाऱ्याची गार झुळूक हळूच समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांना स्पर्श करून तनयपर्यंत  पोचत होती. थेंब थेंब पाऊस पडू लागला. तनय ला तिची आठवण येत होती.

अश्यातच एकाने त्याची छेड काढलीच...

एक मित्र - काय रे तनय, तुझी ती कुठेय? आज नाही का ती सोबत तुझ्या?  कसं होणार तुझंं आता?

दुसरा मित्र - तिच्याशिवाय तर तुझं पानसुद्धा  हलायचं नाही ना.... 

एक मैत्रीण – कशाला त्याला चिडवताय रे?

ते सगळे मिळून त्याला चिडवायचे पण तनयला त्यांचा कधीच राग नाही आला.

उंच, सडपातळ, रंगाने ती जरी काळीसावळी असली तरी तिचा तो नखरा, तिचा तोरा काही औरच होता.

पाऊस, तनय आणि ती ....हे तनयचं आवडीचं समीकरण.

पाऊस पडायला लागला की तनयला तिची आठवण आल्याशिवाय राहत नसे. कारण गेल्याच पावसाळ्यात ती तनयला भेटली होती. कॉलेजमध्ये तनयला तिच्याशिवाय कोणी पहिले नाही असा एक दिवस नाही. तनयची आणि तिची जोडी त्याला फार आवडे.

समुद्रकिनाऱ्यावरच्या तुफान वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने तनयला बैचेन केलं. तिच्यासोबतच्या त्याच्या सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.

तनय तिला घेऊन सीफेसवर यायचा. पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटला की तनयला त्या वाऱ्याचा खूप राग यायचा. तो तिला त्याच्यापासून दूर नेईल की काय असे त्याला वाटायचे. म्हणून तो तिला घट्ट पकडून ठेवत असे. अश्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

ज्याने तिला त्याच्यापासून लांब केलं, तनयला त्याचा प्रचंड राग येत होता. पण आता त्याचा नाईलाज होता.

आता त्या फक्त आठवणी राहिल्या होत्या. त्याला आता तिच्याशिवाय राहणं भाग होत. त्याला गोष्टीचा राग येत होता ली शेवटी त्याला यंदाचा पावसाळा तिच्याशिवाय काढावा लागणार होता.

इतक्यात कोणीतरी त्याला मस्करीत म्हणालचं.. .अरे तनय आता बसं झालं.. आता नवीन विंडचीटर घे.

तनयला त्याचा सल्ला पटला आणि त्याने नाईलाजास्तव होकारार्थी मान हलवली.


हो.....

गेल्या वर्षी तनयच्या काकांनी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची खास इम्पोर्टेड आणलेली “ती“, 

छत्री’’  क्लासरूम मधून कोणीतरी ढापली होती.

आणि म्हणून त्याला यावर्षी नवीन छत्री किंवा विंडचीटर घेण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता.

 



शुक्रवार, ११ जून, २०२१

असे हे प्रेम (अंतिम भाग)

 फोनवरचंं प्रेम.... 

रवी – (त्याचा अत्यंत आवडता आवाज ऐकण्यासाठीची आतुरता आणि तिच्यावरचा राग या अश्या संमिश्र भावनेनेच तो म्हणाला...) हॅलो! मला थोडं बोलायचं आहे.

ईशाने तब्बल एका महिन्यानंतर रवीचा आवाज ऐकला होता. तो समोर असता तर घट्ट मिठी मारली असती. इतक्या आनंदात ती होती. पण तिने केलेल्या चुकीची जाणीवदेखील तिला होती. म्हणून तिने पुन्हा एकदा त्याची माफी मागितली.

इशा – सगळ्यात आधी मला माफ कर. मला माहिती आहे आपल्यात ठरलं होत की आपण काहीच लपवायचं नाही; पण तू माझ्यापासून दूर जाशील म्हणून मी तुला अविनाश बद्दल सांगितलं नव्हत.

रवी – (तिचा तो आवाज ऐकूनच त्याचा निम्मा राग गेला होता.) इशा ज्या कारणामुळे मी तुला माफ करावं अस तुला वाटतंय, खरतर त्या कारणामुळे मी तुझ्यावर कधीच रागावलो नव्हतो. तुझ्या आयुष्यात माझ्या आगोदर कोणीतरी होतं याचं वाईट मला वाटत नाहीये. तू ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस याचं मला दुखः आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, जर काही असेल तर ते आताच सांग. हे पहा तुझ्या या चुकीमुळे मला जे दुखः झालं ते नक्कीच माझ्या प्रेमाहून मोठं नाहीये.

इशा – रवीचं बोलणं ऐकून तिला दिलासा भेटला. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होता; पण आपलं माणूस न गमावण्याचा आनंद जास्त होता.

त्या दोघांनीही गोष्टींचा गुंतागुंत सोडवून पुन्हा एकदा नव्याने नात्याला सुरुवात केली.

पुढच्या दोन वर्षांनंतर ईशाच ग्र्यॅजुएशन पूर्ण झालं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती आता नाशिकला जाणार होती पुढचं शिक्षण पूर्ण करायला. तिने ही बातमी रवीला सांगितली. रवीच्या आनंदाला पारावार नव्हता. इशा आपल्याच शहरात येणार. ही गोष्ट त्याच्या मनाला एवढी सुखावत होती की गेले दोन तीन वर्ष तो तिच्यापासून एवढा लांब होता याचं लेश त्याच्या मनातून दूर कुठेतरी गेलं होत.

अखेर त्याचं लाँगडिसटंस नात संपून ते दोघे आता एकाच शहरात राहणार होते. जे काही मतभेद त्यांच्यात असलेल्या अंतरामुळे उद्भवत होते ते कमी होणार होते. आतापर्यंत ते दोघे एकमेकांना फक्त फोनवरून अनुभवायचे; पण आता ते सगळं बदलणार होत. ते दोघेही खूप खुश होते.

इशा नाशकात आली. रवी तिथे असल्यामुळे ईशाला स्थिरस्थावर व्हायला मदत झाली. तिचं कॉलेज सुरळीत चालू झालं. अनेक महिन्यांनंतर भेटणारे रवी इशा आता जवळपास रोजच भेटू लागले. त्यंना इतक्या वर्षांपसून जे पाहिजे होत ते सगळ घडत होत. हळू हळू ईशाची ओळख रवीच्या घरच्यांशी वाढू लागली. त्याचा मित्रपरिवार आता तिचाही झाला होता. ते दोघेही खूप खुश होते.

पण पुढे गोष्टी थोड्या बदलू लागल्या. रवीला त्याच्या कामामध्ये अडचणी येऊ लागल्या. रवीची चिडचिड वाढू लागली. तो तिला गृहीत धरू लागला आणि त्याचा परिणाम थेट यांच्या नात्यावर दिसू लागला. त्यांची भांडणे वाढू लागली. ईशाचा स्वभाव मुळातच थोडा रागीट होता हे तुम्हाला कथेच्या सुरवातीलाच समजले असेल. ती जेवढी रागीट होती तेवढीच हळवी होती. त्याच्या अश्या वागण्याचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. त्या भांडणांमुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले. एकाच शहरात राहूनदेखील ते क्वचितच भेटू लागले.

कधीकाळी ज्यांना एकमेकांशिवाय न बोलता करमत नसे, आता तेच दोघे फक्त कामापुरत बोलू लागले. भेटले तरी भांडणच. यांच्यात आलेला दुरावा आता इतरांना देखील जाणवू लागला होता. स्पष्टपणे दिसू लागला होता.

एके दिवशी रवी आणि इशा, रवीच्या एका नेहमीच्या मित्रासोबत गप्पा मारत चहा टोस्ट खात होते. बघता बघता गप्पांच्या ओघात कोणत्यातरी विषयावरून रवी आणि ईशाचे मतभेद होऊ लागले. वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. इशा रागाने तिथून निघून गेली. रवीनेही तिला थांबवलं नाही.

रवी आणि इशाच्या चांगल्या वाईट काळात तो सामील असायचा. त्याने रवी आणि इशाच एकमेकांवरच नितांत प्रेम पाहिलं होत. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या या जोडप्याच नात आजच्या घडीला या ठिकाणी येऊन ठेपलंय हे पाहून त्याला देखील ते पाहवले नाही.

 बराच वेळ झाला इशा परत आली नव्हती. तिचा फोन देखील लागत नव्हता. त्याने रवीला समजावलं आणि ते दोघेही ईशाला शोधायला निघाले. तिच्या मैत्रीणीना विचारून झालं, एक दोन ठिकाणी पाहून झालं; पण इशा तिथे नव्हती. त्याला आता तिची काळजी वाटू लागली होती. तेवढ्यात रवीच्या लक्षात आलं, इशा टेकडीवरच्या गणेश मंदिरातच असणार. ते दोघे लगबगीने तिथे पोचले आणि खरचं रवीचा अंदाज खरा ठरला, ती तिथेच होती.

तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला आणि रवीला समोर बघून इशाचे डोळे पाणावले. त्यादोघांना पुन्हा एकदा कळून चुकलं की ते दोघे एकमेकांशिवाय नाहीच राहू शकत. त्याच क्षणी त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

नंतर एक वर्षभरात त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल रीतसर घरी सांगायचं ठरवलं. तसं रवीच्या घरी कल्पना होतीच. त्याने इशाबद्दल घरी सांगितलं. घरी थोड तणावाच वातावरण निर्माण झालं रवीच्या वडिलांना हे मान्य नव्हत; पण रवी आणि इशा दोघेही ठाम होते. रवीने घरी बाबांना मानवायचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याचे प्रयत्न यशस्वी झाले.

 पण अजून एक किल्ला लढवण बाकी होत. इशाच्या घरी तिची लहान बहिण आणि एक दोन जवळच्या मैत्रिणी सोडल्या तर कोणालाच रावीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल माहिती नव्हत.

त्या दोघांनी ठरवूनच ही गोष्ट तिच्या घरच्यांपासून गुपित ठेवली होती. पण आता सांगण तर भाग होत. मोठ्या हिमतीने ईशाने आई वडिलांना रावीबद्दल घरी सांगितलं. ईशाचे आई वडील दोघेही या लग्नाला तयार नव्हते.

खूप मतभेद, खूप रडे, खूप भांडण या सगळ्यातून वाट काढत त्याचं नात लग्नाच्या उंबऱ्यात येऊन ठेपल. अखेरीस त्यांच्या मनासारखं घडत होत.

आणि ती वेळ आलीच.. त्यांच्या लग्नाचा दिवस.... देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, आई वडील आणि मित्रपरिवार यांच्या समवेत, त्यांच्या या सुखद आणि खडतर प्रवासाचे क्षण, असे सगळेजण आज रवी आणि इशाच्या गोड लग्नसोहळ्याचे साक्षीदार होते.

रवी आणि ईशाने एकमेकांना पाहिलं आणि गेली आठ वर्षे त्या दोघांच्या डोळ्यासमोरून तरळली. दोघांनाही भरून आलं. 

आठवर्षांपूर्वी एका राँग नंबरमुळे या दोन मनांची ओळख झाली होती. नियतीनेच त्या दोघांना एकमेकांसाठी निवडलं होत.आज त्या दोन वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या व्यक्ती, ती दोन मनं एकत्र येणार होते.

चला तर मग रवी आणि इशा यांना भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन आपली कथा इथेच संपवूया.



 समाप्तः

गुरुवार, १० जून, २०२१

असे हे प्रेम (भाग २)

 फोनवरचंं प्रेम.....

कालांतराने ईशाला या खोट्याच ओझ जड वाटायला लागलं. तिला तिची चूक काबुल करायची इच्छा तर होती पण तिला परिणामांची भीती होती. तिला वाटू लागले की जर हे सत्य रवीला समजले तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो माझ्यापासून लांब जाईल. त्यापेक्षा मीच त्याच्याशी बोलणार नाही जेणेकरून त्याला लागलेली माझी सवय तुटेल आणि त्याला माझ्यापासून लांब जाणं सोप होईल.

इच्छेविरुद्ध ती त्याच्याशी तुटक वागू लागली. नेहमीसारखं वेळ काढून बोलणं तिने कमी केलं. तिला देखील माहिती होत की या सगळ्यात रवीची काहीच चूक नाही तरी देखील त्याच्याशी असं वागून मी खूप वाईट करतीये हे तिला कळत होत.

त्याला असं दूर लोटणं तिला कठीण जात होत. पण सत्य लपवून खोटेपणाने जगणंसुद्धा तिला जमत नव्हत.

इकडे रवीला काहीच कळत नव्हत की इशा अशी का वागते. त्याचं काय चुकलंय की ती त्याला अशी दूर लोटतीये. तो सगळ्या परीने तीला विचारायचा, तीला समजवायचा प्रयत्न करत होता. ईशाला हे सगळ कळतही होत. झोपलेल्याला उठवू शकतो पण जो जागा आहे त्याला कसं काय उठवायचं? अशीच काहीशी ईशाची अवस्था होती. पण सत्य सांगण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. ती रवीला गमावून बसेल याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती. कारण ही गोष्ट, हे सत्य सांगायची वेळ मागे निघून गेली होती असे तिला वाटत होते.

बघता बघता एक वर्ष सरलं. ईशाला वाटलं होत; वेळ जाईल तशी त्यांची एकमेकांना लागलेली सवय सुटेल; पण तसं काहीच घडलं नाही.

जे घडत होत त्याचा दोघांनाही त्रास होत होता. ईशाच्या लाख प्रयात्नानीही तिला त्याच्यापासून लांब जाता येत नव्हत. तीला रावीशिवाय जगायलाच जमतच नव्हत; पण तिच्या खोटेपणासोबत आयुष्यात पुढे जाणदेखील शक्य नव्हत.

अखेर तिने त्याला खर काय ते सांगायचा निर्णय घेतला. सगळी हिम्मत गोळा करून तिने रवीला फोन केला.

इशा – हॅलो, थांब रवी... तू काही म्हणायच्या आत मला तुला काहीतरी खूप महत्वाच सांगायचय. जर मी हे आता बोलू शकले नाही तर पुन्हा मला जड जाईल सगळ सांगायला.

रवी – (थोडा घाबरून आणि गोंधळलेल्या स्तिथीत तिला विचारतो) इशा काय झालं? काय सांगायचं आहे तुला?

इशा – मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. गेले बरेच महिने... नव्हे वर्ष.... मला हे तुला सांगायचय.

तुला आठवतंय का मी तुला एकदा अविनाश बद्दल सांगत होते?

रवी- खर तर मला आठवत नाहीये. पण बोल ना, त्याचं काय?

इशा – तो.....त्याच....म्हणजे... मी सांगणारच होते तुला आधीच पण....

रवी – काय झालायं इशा? कोण अविनाश? आणि त्याचा काय संबंध इथे?

इशा – अविनाश वानखेडे. माझा वर्गमित्र. दहावीपासून आम्ही एकत्रच होतो. तो माझा खूप चांगला मित्र होता.

रवी – हऽऽ...बरं मग?

इशा - तू जेव्हा मला पहिल्यांदा फोन केला होतास त्याच्या काही महिन्यांपूर्वीच आमचं खूप मोठ भांडण झाल होत.

रवी – कशावरून? असलं भांडण?

इशा – कॉलेज मध्ये असताना सगळ्यांना वाटायचं की आम्ही एकत्र आहोत. पण तसं खरच काही नव्हत. खर सांगायचं झालं तर अविनाश माझ्यासाठी एका चांगल्या मित्राहून अधिक जवळचा होता. तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा व्यक्ती होता. आमच्यात आगदीच प्रेम म्हणावं अस नव्हत; पण प्रत्येक सुख दुःखाचे आम्ही साथीदार बनलो होतो. रवी, मला चुकीच समजू नकोस.  

तुझ्यापासून हे सगळं लपवायचं नव्हत रे....पण माझा धीरच होत नव्हता.

(हे सगळ ऐकताना त्याच्या मनावर खोल घाव होत होते. तिचं बोलणं, तिचा एक अन एक शब्द त्याच्या मनाला काट्यासारखा बोचत होता. तरीही रवी ईशाच बोलणं शांतपणे ऐकत होता.)

इशा – रवी मी तुला अंधारात ठेवलं. मला माहिती आहे तुझा माझ्यावर असलेल्या विश्वासाला मी धक्का दिलायं. मला स्वतःला तुझ्यापासून हे लपवणं चूक वाटत होत म्हणून मी.....

(रवी तिचं बोलणं मध्येच थांबवतो.)

रवी – अच्छा, हे कारण होत तर तुझ माझ्याशी तुटकपणे वागण्याचं? गेला वर्षभर मी विचार करून थकलोय. माझ्याकडून काय चूक झालीये की तू अशी वागतेस?  इशा, मला खर तर काहीच सुचत नाहीये हे सगळ ऐकल्यानंतर..  मला आता काहीच बोलायचं नाही आहे. आपण नंतर बोलू. (एवढे बोलून रवी रागाने फोन ठेवतो)

त्यानंतर इशा बऱ्याचदा रवीशी बोलण्यचा प्रयत्न करते पण रवीला तिचा प्रचंड राग आलेला असतो. तो तिच्या कोणत्याच फोन आणि मेसेजचं उत्तर देत नाही.

असेच काही दिवस उलटून जातात. ईशाला झाल्या प्राराचा पश्चाताप होतो. ती सर्वतोपरी रवीला समजवायचा प्रयत्न करते; पण रवी अजूनही तिच्याशी बोलत नसतो. त्याला काही केल्या ईशाच हे खोट मान्य नसतं.

(एकट्याने हे दुःख पचवणे त्याला जड जात होत म्हणून न रहावता रवी ही गोष्ट आपल्या मित्राला सांगतो.)

रवी - आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलंय. जिच्याशी आयुष्यातल्या लहान-मोठ्या, अगदी सगळ्या गोष्टी सांगितल्या.. तिनेच आपल्याला अंधारात ठेवलं. मान्य आहे तो तिचा भूतकाळ आहे; पण या नात्यात येण्यापूर्वी आम्ही दोघांनी ठरवलं होत की कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही. मला या गोष्टीचा त्रास नाही की माझ्या आगोदर आणखी कोणी तिच्या आयुष्यात होतं; पण मला याच दुःख आहे की ती माझ्याशी खोट बोलली. जर ती हे खोट बोलू शकते तर आजवर तिने अश्या अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या असतील. मला तिच्याशी यापुढे कधीच, कसलेच संबंध ठेवायची इच्छा नाहीये.

अश्विन (रवीचा मित्र) – रवी, तुला मी फक्त एकच प्रश्न विचारेन.... तुझ्याशी ती खोट बोलली, गोष्टी लपवल्या, तुला आधारात ठेवलं, सगळं मान्य आहे. तुझं तिच्यावर चिडणं हे देखील सहाजिक आहे आणि हो तू तिच्यावर रागावलाही पाहिजेस; पण हे सगळ करून तू तिच्याशिवाय राहू शकतोस का?

अश्विनचं बोलणं ऐकून रवी निशब्द झाला. रागात त्याला तिच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमाची जाणीवच झाली नाही. पण ती जे वागली होती; ही गोष्ट काहीकेल्या त्याला पटतच नव्हती.

थोडं शांत होऊन, थोडा विचार करून, रवीने ईशाला फोन केला. एकेकाळी ज्या दोघांना एकमेकांशी बोलायला दिवस देखील पुरत नव्हता ते इशा आणि रवी गेला महिनाभर एकमेकांशी बोललेसुद्धा नव्हते.

रवीचं साधं नाव पाहून जिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची, ती आज चातक पक्षापरी रवीच्या फोनची वाट बघत होती. तिने रवीचा फोन पहिल्या रिंग मध्येच उचलला, जणू ती या एका फोनचीच वाट पाहत होती.

 क्रमशः




त्याने तिला काय सांगण्यासाठी फोन केला असेल?  त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं असेल? रवी ईशाला माफ करेल का? ईशाने ही गोष्ट लपवून चूक केलं का? की तिला वाटणारी भीती सहाजिक होती?

तुम्हाला काय वाटतंय हे नक्की मला कळवा. 

पुढे काय घडलं हे तुम्हाला सांगण्यासाठी  लवकरच कथेचा शेवट घेऊन येणार आहे.  

बुधवार, ९ जून, २०२१

असे हे प्रेम (भाग १)

 फोनवरचंं प्रेम.....

ती सुरुवात होती. 

त्या दोघांच्या नात्याची. नव्हे त्यांच्या ओळखीची.

(बाजारात एवढी जास्त गर्दी होती. त्यात ते रिक्षवाले... जगाची घाई असते त्यांना तर, कळतच नाही. कसेही रिक्षा चालवतात. मझ तर डोकच फिरलंय)

अशी काहीशी चिडलेल्या स्वरात ती घरात आईला हे सगळ सांगत  होती. या सगळ्यात फोन येऊन गेला हे तिच्या ध्यानातच आलं नव्हत. नंतर तिने फोन चेक केला. तो अनोळखी नंबर होता. कोणाचा असेल फोन? पुन्हा करु का त्या नंबरवर फोन? हा विचार करत असताना पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला. यावेळी तिने फोन उचलला.

तो – (ती काही बोलायच्या आतच) अरे भावा, कुठे आहेस? फोन नाही काही नाही...

ती – हॅलो, कोण बोलतंय?

तो – (तिचा आवाज ऐकून तो जरा थबकला आणि दबक्या आवाजातच म्हणाला..) मी रवी. आपण कोण बोलतंय?

ती – चिडक्या स्वरातच तिने उत्तर दिलं; आपल्याला कोणाशी बोलायचं आहे?

तो – रजत साळुंखे, याचाच नंबर आहे ना?

ती – मी रजत साळुंखे वाटतीये का तुम्हाला?

(ती आधीच चिडली होती.  त्यात तिच्या रागाने जणू आगीत तेलाचच काम केलं. त्या दोघांचे फोनवरच कडाक्याचे भांडण झाले.)

आणि अशी झाली सुरुवात. ती चिडून बोलली. तो देखील भांडला. तेव्हा त्या दोघांनाही ठाऊक नव्हत की हा कॉल पुढे जाऊन त्या दोघांना एकत्र आणणार होता.

होय ! अगदी बरोबर ऐकलत. ते दोघे त्या एका राँग नंबरमुळे आयुष्यभरासाठी ओळखीचे झाले.

विचारात पडलात ना? एक चुकीचा फोन आणि आयुष्यभराचा संबंध... कसं काय बरं शक्य आहे? हल्ली तर लोकं राँग नंबर आहे हे समजताच फोन ठवून देतात.

अहो! प्रेमाची परिभाषाच वेगळी आहे. प्रेमाला तुम्ही कधीच एका चौकटीत बांधून ठेवू नाही शकत. ज्यांना एकत्र यायचंच आहे त्यांना एक राँग नंबर देखील पुरेसा आहे की ओ...

चला तर मग पुढे वाचूया त्या दोघांसोबत काय घडलं.

तर मग त्यांचा फोन कॉलवरच संभाषण ऐकून समजलाच असाल त्यांची एकमेकांसोबाताची पहिली ओळख कश्याप्रकारे झाली ते.

फोन वर दोघेही अगदी जणू माझी चूकच नाही अश्या आविर्भावाने भांडले होते. तिने दुसऱ्यांवरचा राग त्याच्यावर काढला. तो देखील कमी नाही हो यात. त्यानेही चिडचिड केलीच की अनोळखी व्यातीवर. पण नंतर त्या दोघांनाही कळून चुकलं होत. ते दोघे जे काही वागलेत ते सपशील चुकीच होत.

त्यानंतर त्याने तिला एक मेसेज पाठवला. लिहिलं होत, माफ करा. तो मेसेज पाहून तिला स्वतःचीच लाज वाटली. ती खजील झाली. तिने त्याला कॉल केला. जे ती वागली होती त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी, तिने झाल्या प्रकराबद्दल माफी मागितली. जो घोळ तिच्या रागामुळे झाला होता तो त्याला सांगितला आणि एवढ बोलून त्यांनी फोन ठेवला.

बरं एवढ सगळ तर बोलले; पण त्या दोघांनी एकमेकांना त्यांची नावं मात्र विचारलीच नव्हती.

तिच्यासोबत हे असलं काही पहिल्यांदाच घडलं होत. झाला प्रकार तिच्या मनातून जातच नव्हता. कोण असेल तो? कुठून बोलत असेल? असे बरेच प्रश्न तिला पडले होते. तिकडे त्याची अवस्थादेखील काही वेगळी नव्हती. त्याला तर राहून राहून तिचा आवाजच आठवत होता. तो तर तिच्या अवजावरच फिदा झाला होता. कधी पुन्हा तो आवाज कनी पडेल याचाच तो विचार करू लागला. असेच पुढचे काही महिने निघून गेले.

एव्हाना तो आपल्याला विसरलासुद्धा असेल आणि तिला तर मी आता आठवत देखील नसेन अश्या भ्रमात ते दोघे जगत होते. दोघांनाही एकमेकांशी बोलायची ओढ लागली होती.

शेवटी हिम्मत करून एके दिवशी पाडव्याचं निमित्त साधून त्याने तिला शुभेच्छा द्यायला कॉल केला. त्याचा नंबर पाहून तिने क्षणाचादेखील विलंब न करता फोन उचलला. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. खुशाली विचारली. तो तर तिचा आवाज ऐकण्यात एवढा मग्न झाला होता की सगळ बोलून झालं तरी तिला तीच नाव काही विचारलच नाही. शेवटी तिनेच तीच नाव त्याला सांगितलं.

ती – माझ नाव इशा देवकर. मुंबईत ग्र्यॅजुएशन करते. तुम्ही कुठून बोलताय?

तो – मी रवी. रवी देशमाने. मी मुळचा नाशिकचा. माझे आई, वडील आणि ताई सगळे तिकडेच राहतात. मी चेन्नईला असतो. तिथेच शिकतोय.

अश्या प्रकारे ते दोघे एकमेकांना सणावारालाच नव्हे तर इतर दिवशीही मेसेज करू लागले. त्यांच्यातला संवाद वाढला. आता तर दोघांनाही एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हत.

जसा वेळ मिळेल तसे ते एकमेकांशी बोलत. त्या दोघांना दिवसही अपुरा पडत होता. असे पुढे दोन वर्ष ते एकमेकांसोबत होते. न भेटता, स्पर्शाविना भावना फुलत होत्या. नवीन नात उलगडत होत. नंतर रवी त्याचं शिक्षण पूर्ण करून नाशकात परत आला. तिथेच तो पुढे त्यचं काम सुरु करणार होता. इशा आणि रवीच्या या वर्चुअल, ओनलाईन, फोनवरच्या नात्याला आता जवळपास दोनहून जास्त वर्ष झाली होती. आत्मिक ओळख अपुरी पडायला लागली, आता त्या दोघांच भेटणं खूप गरजेच झालं होत.

शेवटी त्यांनी भेटायचं ठरवलं. तो तिला मुंबईत भेटायला येणार... दिवस, जागा, वेळ अस सगळ ठरलं. एकमेकांना भेटायची आतुरता, आनंद, भीती अश्या एकत्रितपणे सगळ्या भावनांनी त्या दोघांना भंडावून सोडल होत.

अखेर तो दिवस आला. सकाळी पहिल्या गाडीने तो निघाला. भेटायची वेळ सकाळची नऊ वाजताची होती. रवी तब्बल दीड तास लवरकर पोचला. त्याला खर तर मुंबई हे शहर फारस रुचत नव्हत. पण आज मात्र रवीला या शहराच्या गर्दीत, लगबगीत आणि गोंधळ यातसुद्धा स्तब्धता, शांतता भासत होती.

तिची वाट बघताना बरेच विचार त्याच्या मनात येत होते. तिला मी आवडेन का? इतके दिवस जिचा फक्त आवाजच ऐकला होता तिला आज प्रत्यक्षात समोर पाहणार या विचारेनेच तो बैचेन झाला होता. एक एक सेकंद त्याला एक तासापरी भासत होता.  

नेहमी सगळीकडे उशिराने पोचणारी इशा आज वेळेच्या आधीच घरातून निघाली. आज ज्याच्याशी आपण फक्त फोनवरच बोललो होतो त्याला समोर बघून तिची काय अवस्था होणार होती या विचारानेच तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली.

तिने त्याला फोन केला.

इशा – कुठे आहेस रवी तू? मी घरातून निघाले आहे. लवकरच पोचेन आपल्या ठरलेल्या जागी.

त्याचं उत्तर आलं; मागे वळून पहा.

तिच्या मनात एकदम धस्स झालं. पोटात गोळा आला. तिने मागे वळून पाहिलं तर तो उभा होता. ती लाजली. तो शहारला. दोघांनाही काय बोलावं सुचेना.

त्यादिवशी पहिल्यांदा ते दोघे एकमेकांना फोन वरून नाही तर समोरासमोर हात मिळवून हॅलो म्हणाले.

तो स्पर्श ते दोघे कधीच विसरू शकत नव्हते.

त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं हे तुम्हाला देखील जाणवलं असेलच. त्या दोघांनासुद्धा ते कळत होत पण; त्यांच्यापैकी हे कोणीच मान्य करत नव्हत. त्यांचे मित्र मैत्रिणी त्या दोघांनाही या नात्यापासून दूर खेचत होते. असं नात टिकत नाही. तो एवढ्या लांबचा आहे, तिच खर खोटं माहिती नाही, फसवणूक होऊ शकते. असे अनेक सल्ले त्या दोघांना मिळत होते.

आणि इशा या सल्ल्यांची शिकार झाली. तिला कुण्याएका मैत्रिणीने टुकार सल्ला दिला आणि ईशाने तसच केलं. ही तिची त्यांच्या नात्यातली पहिली चूक. ईशाचा रवीवर निस्सीम विश्वास होता. ती त्याला तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगत गेली. अगदी दिवसभर जे घडलं त्यापासून ते जे तिच्या आयुष्यात घडून गेलंय. अगदी सगळ सगळ; फक्त एक गोष्ट तिने लपवली होती. ती म्हणजे तीच्या आयुष्यात रवीच्या आधी एक व्यक्ती होती.

 

 

तुम्हाला काय वाटतंय की ईशाने ही गोष्ट पुढे रवीला सांगितली असेल का? तिच्यावर एवढा विश्वास ठेवणाऱ्या रवीला तिने ही गोष्ट न सांगून बरोबर केलं का? ही गोष्ट सांगून त्यांच्या या गोड नात्यावर याचा कसा आणि काय परिणाम होऊ शकतो?

त्याचा अपूर्ण संवाद.

आज प्रिया ऑफिसमधून घरी आल्यावर, आवरून तिने फोन हातात घेतला. तिच्या ऑनलाईन अकाऊंटवर एक अनोळखी मेसेज होता. म्हणून आगोदर तिने एवढ लक्ष दिलं नाह...