सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

गंपू आला रे..



 दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आम्ही सगळे चुलत भाऊबहीण, सगळे काका-काकू आमच्या कोंकणातल्या आजी-आजोबांच्या घरी गणेशाच्या उत्सवानिमित्त तब्बल पाच दिवसांसाठी एकत्र आलो... पूर्ण वर्षभराने एकदा एवढ्या दिवसांची सुट्टी काढून आम्ही सगळे एकत्र सण साजरा करण्यासाठी जमतो.

प्रचंड धमाल, मस्ती, आई आणि काकूंनी बनवलेले मोदक, आदल्या दिवशी काका आणि दादा, ताई सगळ्यांसोबत रात्री मखर बनवायची लगबग हे सगळं करताना वर्षभराची कामाची दग दग, टेन्शन सगळं भरून निघाल्यासारखं वाटतं.

पुढचे पाच दिवस आमचे एकत्र कुटुंबात खूप जास्त भारी जातात... आम्ही सगळे बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतो. एवढी की मेसेज ग्रुपवर आधीपासूनच आमच्या चर्चा सुरू असतात. यावर्षी कोणतं डेकोरेशन करायचं? कोणी कोणते कपडे घालायचे? पाच दिवस काय काय करायचे? काय काय  खाऊ बनवायचा?
जागरणाच्या वेळी कोणते खेळ खेळायचे....या सगळ्याची यादी आधीच ठरलेली असते.

आमच्या घरात सालाबादप्रमाणे जगरणाच्या एका रात्री एक सोंगट्यांचा खेळ खेळला जातो. या खेळात दोन टीम असतात. एका टीमचे कॅप्टन आजोबा असतात आणि दुसऱ्या टीमची कॅप्टन आमची लाडकी आजी असते. आणि आम्ही सगळे लहानमोठे दोन टीममध्ये विभागून हा जुना खेळ खेळतो.
दुसऱ्या दिवशी आताचे नवीन गेम्स खेळले जातात.
तिसऱ्या दिवशी नवीन खाऊ बनवला जातो.
अश्याप्रकारे आमचं पाच दिवसाचे जागरण अगदी नियोजनबद्ध चालतं.
एकदा सकाळ सकाळ आजी आम्हाला सगळ्यांना घेऊन चुलीपाशी बसली होती. नीलम ताईला चुलीवरचं जेवण शिकवता शिकवता ती आम्हाला गरम गरम चुलीवरची भाकरी आणि पिठलं खाऊ घालत होती.

गौरव दादा आणि बंटी दादा आजोबांसोबत मागच्यादारात गोठ्यात गाईची आणि आमची बैलजोडी म्हणजेच  जय विरुची जोडी याना अंघोळ घालत होते.
चिनू आणि रोहन यांच्यावर दुर्वा, फुले हे सगळं गोळा करून आणण्याची जबाबदारी होती.
त्यानंतर हे सगळं आवरून, अंघोळ आटपून आम्ही सगळे बाप्पाच्या आरतीला जमा झालो.
आरतीनंतर प्रसाद कोणी वाटायचा यावरूनही कधीकधी लहानग्यांची झुंबड उडते.
नंतर प्रसाद घेऊन झाल्यावर घरातले सगळे एकत्र जेवायला बसतात.
असच जेवता जेवता गप्पागोष्टी चालू असताना
आमच्या लहानग्या चिनूने आजोबांना एक प्रश्न विचारला....

चिनू- आजोबा बाप्पा आपल्या घरी येतो , एवढे दिवस रहातो मग तो येताना त्याची बॅग का आणत नाही?
तो ब्रश सुद्धा करत नाही. त्याला त्याचे आई बाबा ओरडणार नाहित का?
आणि तो कुठून येतो आपल्याकडे?
तिचे असे खुपसरे प्रश्न ऐकून एक एक जण तिला पटेल असे उत्तर देऊ लागले.

असंच प्रश्नउत्तरांमधून अजून एक प्रश्न आला...
गणपती आपल्याकडे यायची प्रथा कशी पडली?
काहीजण त्यावर अनेक उत्तरं देऊ लागले.
अनेक कथा, अनेक रूढी यांचे संदर्भ देऊ लागले.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सामाजिक गणेशोत्सव कसा हळू हळू वायक्तिक होऊन गेला. लोकमान्य टिळकांमुळे गणेशोत्सव देशातच नव्हेतर परदेशात ही प्रसिद्ध झाला.

पण हा एकमेव असा देव आहे जो प्रत्येकाला स्वतःचा वाटतो.
माझा बाप्पा बोलताना जी आपुलकी वाटते ते काही औरच समाधान आहे.

घरात गणपती आणल्याने ते घरातील सर्व अडथळे दूर करतात.
भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी... ऑगस्ट, सप्टेंबर या काळात गणेश चतुर्थी येते.
एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला.
असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो.

व्यासमुनींच्या मुखातून बाहेर पडणारे एक अन एक शब्द लिहून काढण्याची जबाबदारी भगवान गणेश यांनी घेतली होती.
महाभारत लेखन सुरू झाले. हा काळ बराच मोठा होता.
संपूर्ण महाभारत कथा समजून, लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.

कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशीही एक कथा सांगितली जाते.
असे आम्हाला सदा काकानी सांगितले. सदाकाका म्हणजे आमचा सगळ्यांचा धाकटा काका... गौरव दादहून फक्त पाच ते सहा वर्षांनी मोठा.... पण फारचं अध्यात्मिक बुआ....


कधीतरी आम्हालाही घेऊन बसतो तो... सुरवातीचा वेळ मस्त जातो काहीतरी नवीन आणि अचंबित असे सांगत असतो तो पण; कधी कधी फारचं कंटाळा येतो... त्याच्या गोष्टी प्रवचन वाटू लागतात. पण त्याचं वाचन आणि अध्यात्माशी जवळीकता बघून भारी वाटतं.

बघता बघता संध्याकाळ झाली गणपती विसर्जनासाठी सगळे तयार होऊ लागले...  थोड्याच वेळाने बाप्पा निघाले. मिरवणूक विसर्जन तलावापर्यंत पोचेस्तोवर संध्याकाळचा काळोख झाला आणि मला पहिल्या दिवसाची आठवण झाली. आजीने आम्हाला सांगितले होते की," अरे पोरांनो, बाहेर जाताय पण; वर त्या पांढऱ्या ठिपक्याला पाहू नका बरं.... वर चंद्राला न बघताच कुठे फिरायचं ते फिरा"

असे का ?
हे मी आजीला विचारायला गेले... तर तिने मला असे सांगितले," एकदा गणपती बाप्पा त्यांचे आवडीचे मोदक खाऊन त्यांचे वाहन म्हणजे उंदिर, याच्या पाठीवरून जात होते. वाटेत त्याला साप दिसल्याने उंदीरमामा घाबरला आणि मध्येच थांबला त्यामुळे गणपती बाप्पा त्याच्या पाठीवरून खाली पडले.  आणि त्यांचे पोट फाटून सारे मोदक खाली पडले. बाप्पाने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि आपले पोट त्या सापाने बांधून टाकले. हे पाहून आकाशातील चंद्र हसू लागला...

गणपतीला राग आला आणि तुझे चतुर्थीला कोणीच दर्शन करणार नाही असा चंद्राला शाप दिला." तेव्हापासून त्याचे दर्शन कारणे वर्ज्य मानले जाते.

आल्यापासून गणेशोत्सवाच्या इतक्या भन्नाट कथा ऐकून मी बाबांना विचारले, "काय ओ बाबा, हे सगळं खरं आहे का?",  त्यावर बाबांनी मला सांगितले की बिश्वास ठेवला तर सगळं खरं आहे.
अश्या गणपतीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत.


तुमच्या आजी-आजोबांनी, वाडीलधाऱ्यांनी, शाळेत , कोणी काय काय कथा सांगितल्या आहेत हे मला कमेंटमध्ये कळवा.

गणपती बाप्पा मोरया।
पुढच्यावर्षी लवकर या।

त्याचा अपूर्ण संवाद.

आज प्रिया ऑफिसमधून घरी आल्यावर, आवरून तिने फोन हातात घेतला. तिच्या ऑनलाईन अकाऊंटवर एक अनोळखी मेसेज होता. म्हणून आगोदर तिने एवढ लक्ष दिलं नाह...